नियंत्रण रेषेच्या अल्याड-पल्याड

भारत-पाकिस्तानदरम्यानची नियंत्रण रेषा ही जगातील सर्वात स्फोटक भूप्रदेशांपैकी एक आहे. भारत-पाकिस्तानदरम्यानच्या नियंत्रण रेषेवरील चकमकींचा आणि एरवी हा भाग कसा असतो, याचाही धांडोळा घेणाऱ्या पुस्तकाबद्दल.

भारत आणि पाकिस्तान संबंध व संघर्षांवर वारेमाप साहित्य उपलब्ध आहे. मात्र, फार कमी साहित्यातून द्विपक्षीय संबंधांची अथवा या संबंधांतील काही पलूंची अभ्यासपूर्ण व संतुलित मांडणी केलेली असते. त्याहूनही कमी लेखन हे प्रत्यक्ष जमिनीवर उतरून, विविध क्षेत्रांतील लोकांशी चर्चा करून आणि दोन्ही बाजूंचे मत नोंदवून करण्यात आले आहे. दोन्ही देशांदरम्यान जिथे रोजच एकमेकांविरुद्ध हल्ला होण्याची शक्यता असते आणि वारंवार परस्परांच्या सुरक्षा चौक्यांवर गोळीबार होत असतो अशा युद्धजन्य परिस्थितीचे संयमी विवेचन करणारे लेखन तर जवळपास अस्तित्वात नाही. त्यात जे काही साहित्य उपलब्ध आहे ते लष्करी अधिकाऱ्यांनी स्वत:च्या अनुभवावर आधारित केलेले लेखन आहे, ज्याचे स्वत:चे वेगळे महत्त्व आहे. मात्र भारतीय व पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांनी केलेल्या अशा प्रकारच्या लेखनावर स्वाभाविकपणे राष्ट्रवादाचा पगडा असल्यामुळे, फक्त वास्तविक परिस्थितीचे विश्लेषण करत वाचकांवर निर्णय सोपवण्याऐवजी समाजात विशिष्ट प्रकारचे मत निर्माण करण्याकडे अथवा समस्येवरील समाधान सुचवण्याकडे या प्रकारच्या लिखाणाचा कल असतो. एखाद्या मुद्दय़ावर समाजात मतप्रवाह निर्माण करण्यासाठी आणि त्यानुसार समस्येवर समाधान शोधण्याची आग्रही भूमिका पुरस्कृत करण्यासाठी लिखाण करण्यात वावगे काहीच नाही; मात्र वाचकांना स्वत:ची निर्णयशक्ती नसल्याची प्रतिमा या प्रकारच्या लिखाणातून तयार होते. ज्या वेळी एखाद्या विषयावरील जवळपास सगळेच साहित्य व अभ्यासपूर्ण लिखाण या अनुषंगाने निर्मिले जाते, त्या वेळी त्यातील नावीन्य संपते. भारत-पाकिस्तान संबंधांतील लिखाणाची हीच दशा असताना हॅपिमोन जैकब यांचे ‘लाइन ऑफ कंट्रोल: त्रेवेलिंग विथ द इंडियन अँड पाकिस्तानी आर्मीज’ हे पुस्तक एक निराळाच प्रयोग ठरले आहे.

प्रवास-वर्णन, प्रत्यक्षदर्शी संशोधन, युद्धकथा, पत्रकारिता यांचा सुरेख मिलाफ असलेले हे पुस्तक वाचकांना त्यांच्या आभासी विश्वातील बातम्यांची प्रत्यक्ष जमिनीवरील वास्तविकता काय असते याचे दर्शन घडवते.

भारत-पाकिस्तानदरम्यानची नियंत्रण रेषा ही जगातील सर्वात स्फोटक भूप्रदेशांपैकी एक आहे. सन २००३ मध्ये दोन्ही देशांदरम्यान नियंत्रण रेषेवरील शस्त्रबंदी होण्यापूर्वी दररोज ही रेषा पेटलेली असायची. त्यानंतर दशकभर नियंत्रण रेषेवर तणावयुक्त शांतता होती. सन २०१३-१४ पासून शस्त्रबंदीचे उल्लंघन होण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. अद्याप नियंत्रण रेषेवरील वातावरण सन २००३ च्या पूर्वीसारखे झाले नसले, तरी ते कोणत्याही क्षणी तेवढे भीषण होऊ शकते अशी चिन्हे आहेत. अशा युद्धजन्य वातावरणाची प्रत्यक्षदर्शी व खरीखुरी माहिती संपादन करण्यासाठी नवी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील प्राध्यापक हॅपिमोन जैकब यांनी नियंत्रण रेषेचेच अनेक दौरे केले आणि त्यावर आधारलेले ‘लाइन ऑफ कंट्रोल’ हे पुस्तक पेंग्विन प्रकाशनाने वाचकांपुढे आणले. ‘लाइन ऑफ कंट्रोल’ लिहिण्याच्या प्रक्रियेची तीन वैशिष्टय़े सांगता येतील:

एक- लेखक भारताच्या बाजूच्या नियंत्रण रेषेच्या भागात जसे फिरलेत, तसे नियंत्रण रेषेच्या पल्याड, म्हणजे पाकिस्तानी बाजूच्या भागातसुद्धा फिरलेत. भारतीय भागातून त्यांनी भारतीय सन्यावर नेम धरून बसलेले पाकिस्तानी सैनिक जसे बघितले, तसे पाकिस्तानी भागातून भारतीय सनिकांचेसुद्धा निरीक्षण केले. हे तसे जोखमीचेच काम होते, कारण पाकिस्तानच्या नियंत्रणातील भागात फिरणारी व्यक्ती भारतीय नागरिक असल्याची सुतराम कल्पना भारतीय सनिकांना नव्हती.

दोन- भारतीय लष्कराने त्यांना भारतीय बाजूच्या भागात फिरवले, तर पाकिस्तानी लष्कराने त्यांना पाकिस्तानी नियंत्रणाच्या भागात फिरवले. अशा एका घटनेचे वर्णन करताना लेखकाने लिहिले आहे की, ते ज्या वेळी ब्रिगेडियरच्या हुद्दय़ावरील पाकिस्तानी अधिकाऱ्यासोबत नियंत्रण रेषेकडे निघाले, त्या लष्करी वर्दीत नसलेल्या अधिकाऱ्याने आपली लष्करी गाडी सोडली आणि साध्या मोटारीतून ते नियंत्रण रेषेजवळ पोहोचले. पाकिस्तानी अधिकाऱ्याने असे का केले हे लेखकाला अखेपर्यंत कळले नाही. लष्करी गाडीवर नियंत्रण रेषेपलीकडून गोळीबार होण्याची शक्यता जास्त असल्यामुळे लेखकाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ब्रिगेडियरने हे पाऊल उचलले असल्याची शक्यता आहे. लेखक लिहितात की, नियंत्रण रेषेवर विनाकारण गोळीबार होण्याच्या घटना तुरळक असतात; मात्र एका देशाने एखाद्या भागात केलेल्या शस्त्रबंदी उल्लंघनाचा ‘बदला’ दुसरा देश दुसऱ्याच भागात शस्त्रबंदी उल्लंघन करून घेत असतो. दोन्ही देशांच्या नियंत्रण रेषेवर तनात सनिकांमध्ये एकमेकांच्या ‘उच्चपदस्थ’ अधिकाऱ्यांना टाग्रेट न करण्याबद्दलदेखील अलिखित समजदारी अस्तित्वात असल्याचे लेखक नमूद करतो. त्यामुळे नियंत्रण रेषेजवळ एकमेकांच्या हेलिकॉप्टरवर सहसा गोळीबार केला जात नाही.

तीन- लेखकाने भारत व पाकिस्तानच्या किमान ८० अधिकाऱ्यांशी नियंत्रण रेषेवरील परिस्थितीवर मनमोकळी चर्चा केली, यांपैकी किमान ३० अधिकारी लष्करात कार्यरत आहेत. या चच्रेतून, नियंत्रण रेषेवरील शस्त्रबंदी उल्लंघनाची अनेक बारीकसारीक कारणे, अशा उल्लंघनाला कारणीभूत अथवा साक्षी असलेल्या अधिकाऱ्यांमार्फत लेखकाला कळली. भारतात साधारणत: अशी समजूत आहे की, वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करत पाकिस्तानी सन्य भारतीय सन्याला एकीकडे जुंपवत, दुसरीकडून दहशतवाद्यांची घुसखोरी करवतो. यात बरेच तथ्य जरी असले तरी शस्त्रसंधी उल्लंघनाचे हे एकमात्र कारण नाही! दहशतवाद्यांची घुसखोरी मुख्यत: पीर पिंजल सेक्टरवरून होते, मात्र शस्त्रसंधीचे उल्लंघन दक्षिणेकडील पूंछ व राजौरी सेक्टरमध्ये मोठय़ा प्रमाणात होत असते. सन्याने मुद्दाम अथवा नियंत्रण रेषा स्पष्ट नसल्याने चुकीने शत्रूच्या भागात प्रवेश करणे, कधी-कधी शत्रुप्रदेशात गेलेली जनावरे परत आणण्यासाठी स्थानिक लोकांनी नियंत्रण रेषा ओलांडणे, नियंत्रण रेषेवर सुरक्षेच्या दृष्टीने पक्के बांधकाम करण्याचा प्रयत्न करणे इत्यादी कारणांनी शस्त्रसंधीचे वारंवार उल्लंघन होत असते.

मुळात, सन २००३ मध्ये झालेल्या शस्त्रसंधीला कोणत्याही द्विपक्षीय कराराचा आधार मिळालेला नाही. सन २००३ मध्ये दोन्ही देशांच्या लष्कराच्या डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्सदरम्यान केवळ फोनवरून शस्त्रसंधी करण्याचे ठरविले गेले. या भूमिकेला दोन्ही देशांतील तत्कालीन राज्यकर्त्यांचा आशीर्वाद होता, मात्र त्यानंतर राज्यकर्त्यांनी या भूमिकेला द्विपक्षीय धोरणात्मक स्वरूप देण्यासाठी पावले उचलली नाहीत. परिणामी, शस्त्रसंधीच्या उल्लंघनासाठी कायदेशीररीत्या कुणालाही जबाबदार ठरवणे शक्य नाही. लेखकाने आपल्या कार्यात शस्त्रसंधी उल्लंघनाचे अभ्यासू आलेख तयार केले असून कोणत्या बाजूने कधी व किती प्रमाणात शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले आहे आणि त्याचे राजकीय, राजनीय व लष्करी पडसाद कशा प्रकारे उमटलेत याचा लेखाजोखा तयार केला आहे.

सन २००३ मध्ये शस्त्रसंधी होण्यापासून ते सन २००८ पर्यंतच्या काळात वाजपेयी व मनमोहन सिंग सरकारच्या पुढाकाराने सुरू झालेल्या विश्वासवर्धक प्रक्रिया अद्याप जारी असल्याचे चित्र लेखकाला बघायला मिळाले. नियंत्रण रेषेच्या दोन्ही बाजूंना असलेल्या काश्मीरदरम्यान सुरू करण्यात आलेला व्यापार देवाणघेवाणीच्या तत्त्वावर, म्हणजे व्यापारी मालाच्या बदल्यात व्यापारी माल, अद्याप सुरू आहे. कोणे एके काळी, तसे फार पूर्वी नाही तर फक्त ७० वर्षे आधी, एकसंध असलेल्या महाराजा हरी सिंगच्या राज्यात हिंदू व मुस्लीम व्यापाऱ्यांची रेलचेल असायची. काश्मीर प्रश्न सुटेल तेव्हा सुटेल किंवा कधीच सुटणारही नाही, पण राज्याच्या दोन्ही भागांमध्ये व्यापार पूर्ववत होऊ शकतो, असा विश्वास लेखकाने रेखाटलेल्या व्यापारी देवाणघेवाणीच्या चित्रातून नक्कीच निर्माण होतो.

नियंत्रण रेषेवरील संघर्षांचा सर्वात मोठा फटका रेषेनजीक वसलेल्या गावातील लोकांना बसतो. भारताच्या तुलनेत पाकिस्तानी बाजूला गावकऱ्यांची संख्या लक्षणीयरीत्या जास्त असल्याचा अनुभव लेखकाला नियंत्रण रेषेनजीकच्या भटकंतीत आला. पाकिस्तानी भागात असताना लेखकाने बघितले की, दोन्ही बाजूंच्या डोंगरांच्या माथ्यावर भारत व पाकिस्तानी लष्कराच्या चौक्या आहेत, तर डोंगरांमधील दऱ्याखोऱ्यांमध्ये लोकांच्या वस्त्या आहेत. अशाच एका वस्तीत फेरफटका मारताना लेखकाला लहान मुलांची टोळी आपल्याच एका सवंगडय़ाची टर उडवताना आढळली. शस्त्रसंधीचे उल्लंघन झाल्यावर एका लहान मुलाच्या मानेला बंदुकीची गोळी चाटून गेली. तो बचावला जरी असला तरी त्याच्या सवंगडय़ांमध्ये तो टिंगलटवाळीचा विषय झाला, कारण अशा वेळी कसा पळ काढायचा आणि कुठे लपायचे या तंत्रात तो इतरांपेक्षा कमी पडला.

नियंत्रण रेषेवरील अशा जिवंत कथा ते लष्कराच्या देखरेखीत नियंत्रण रेषेवर होणारा द्विपक्षीय व्यापार ते लाहोर व इस्लामाबादमध्ये पाकिस्तानी राजनैतिक अधिकाऱ्यांच्या देखरेखीतील वास्तव्य ते पाकिस्तानी लष्कराच्या मुख्यालयाला दिलेली भेट असा अनुभवसंपन्न खजिना या पुस्तकात भरलेला आहे. भारत व पाकिस्तानातील संघर्ष व अविश्वासाच्या काळात ‘लाइन ऑफ कंट्रोल’चे पुस्तक स्वरूपात अवतरणे हे दोन्ही देशांतील सहकार्य व सद्भावनेचे प्रतीक ठरले आहे.

लाइन ऑफ कंट्रोल – ट्रॅव्हलिंग विथ इंडियन अँड पाकिस्तानी आर्मीज

लेखक : हॅपिमोन जेकब

प्रकाशक : पेंग्विन इंडिया

पृष्ठे : २८८, किंमत : ५९९ रुपये

………………………………………………………………………………………………………………………………………………

विशेष
परिमल माया सुधाकर
25 June 2020

………………………………………………………………………………………………………………………………………………

Read this review published in Loksatta on 23rdFeb 2019

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

RSS
Follow by Email
Telegram
WhatsApp
Reddit
FbMessenger